सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षा निमित्त ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाड | प्रतिनिधी : ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून, राज्य सरकारने चवदार तळे परिसराचा विकास आणि सुशोभीकरणासाठी ५५ कोटी ८० लाख रुपयांच्या विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता दिली आहे. 'नॅशनल दलित मुव्हमेंट' या संघटनेने शासन आणि 'बार्टी' (BARTI) प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले आहे. १९२७ साली महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रह करून समतेचा संदेश दिला होता. येत्या २० मार्च २०२६ पासून या घटनेच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर चवदार तळ्याचा कायापालट करण्यासाठी हा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे.
कसा असेल ५५.८० कोटींचा विकास प्रकल्प
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने १८ फेब्रुवारी २०२६ रोजी याबाबतचा शासन निर्णय (GR) निर्गमित केला आहे. या प्रकल्पात खालील कामांचा समावेश असेल:
जलशुद्धीकरण : चवदार तळ्याच्या पाण्याचे शास्त्रीय पद्धतीने शुद्धीकरण.
सुशोभीकरण : परिसराचा चेहरामोहरा बदलून ऐतिहासिक वारसा जपणारी कलाकुसर.
पर्यटन सुविधा : देश-विदेशातून येणाऱ्या अनुयायांसाठी आधुनिक सोयी-सुविधा.
ऐतिहासिक जतन : सत्याग्रहाच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी विशेष स्मारकांचे काम.
संघटनेचा पाठपुरावा आणि कृतज्ञता नॅशनल दलित मुव्हमेंटचे राज्य महासचिव डॉ. केवलजी उके यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव गिते, गोविंद मोरे, आप्पा गायकवाड, भाऊराव तायडे आणि जय भैया माने यांनी 'बार्टी'च्या महासंचालकांची भेट घेऊन निवेदन दिले होते. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निधीबाबत माहिती दिली होती. या निर्णयाबद्दल संघटनेचे राज्य सचिव वैभव गिते यांनी राज्याचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे (IAS) आणि समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे (IAS) यांचे आभार मानले आहेत. हा प्रकल्प महाडच्या इतिहासात एक नवा अध्याय ठरणार असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. सुशोभीकरणाचे काम तात्काळ सुरू करावे आणि सर्व कामे दर्जेदार होण्यासाठी महाडचे प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांनी प्रत्यक्ष देखरेख करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
.jpg)
0 Comments