भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात २० मार्च हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. आजच्याच दिवशी १९२७ मध्ये महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक 'चवदार तळे सत्याग्रह' झाला होता. हा लढा केवळ तळ्याचे पाणी पिण्यासाठी नव्हता, तर शतकानुशतके गुलामगिरीत जखडलेल्या शोषित समाजाला 'माणूस' म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी होता. त्या काळात अस्पृश्यतेची पाळेमुळे खोलवर रुजलेली होती. सार्वजनिक पाणवठ्यावर पशु-पक्ष्यांना पाणी पिण्याची मुभा होती, परंतु दलित समाजाला तिथून पाणी घेण्यास बंदी होती. ही अमानवी प्रथा मोडून काढण्यासाठी बाबासाहेबांनी महाडची निवड केली. 'बहिष्कृत हितकारिणी सभे'च्या माध्यमातून हजारो अनुयायांना एकत्र करत त्यांनी समतेचे रणशिंग फुंकले. २० मार्च १९२७ रोजी हजारो सत्याग्रहींसह बाबासाहेबांनी चवदार तळ्याकडे कूच केले. कोणत्याही हिंसेचा आधार न घेता, अत्यंत शांततेने बाबासाहेबांनी तळ्यावर जाऊन हाताच्या ओळीने पाणी प्यायले. हा केवळ पाणी पिण्याचा प्रसंग नव्हता, तर तो प्रस्थापित विषमतेच्या भिंती पाडणारा एक क्रांतिकारी क्षण होता. या घटनेने गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. सत्याग्रहानंतर सनातनी वर्गाकडून तळ्याचे 'शुद्धीकरण' करण्यात आले, मात्र बाबासाहेबांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला. पुढे याच महाडच्या भूमीत २५ डिसेंबर १९२७ रोजी त्यांनी विषमतेचे प्रतीक असणाऱ्या 'मनुस्मृती'चे दहन करून सामाजिक समतेचा पाया रचला. महाडचा हा सत्याग्रह आजही आपल्याला स्वाभिमानाने जगण्याची शिकवण देतो. भारतीय संविधानाने दिलेले समानतेचे अधिकार याच संघर्षातून निर्माण झाले आहेत. लोकशाही मूल्यांची जपणूक करणे आणि समाजात बंधुभाव टिकवून ठेवणे, हीच या ऐतिहासिक सत्याग्रहाला खरी आदरांजली ठरेल. आज महाड येथील क्रांतीस्तंभावर आणि चवदार तळ्यावर हजारो अनुयायी नतमस्तक होत असून, बाबासाहेबांच्या "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" या मंत्राचा पुनरुच्चार केला जात आहे.

0 Comments